Showing posts with label Medical Practice. Show all posts
Showing posts with label Medical Practice. Show all posts

Thursday, July 11, 2019

माझे पेशंट्स माझे गुरु




      १३ डिसेंबर १९८३ रोजी मला एम.बी.बी.एस.चे रजिस्ट्रेशन मिळाले आणि केवळ तीन आठवड्यातच म्हणजे ५ जानेवारी १९८५ ला मी माझ्या दवाखान्याचे उद्घाटन केले. मला मेरीटने मिळालेली पदव्युत्तर शिक्षणाची जागा मी घेतली नाही. आपण फॅमिली डॉक्टर म्हणूनच व्यवसाय करायचा हे मी पक्के ठरवले होते.
      डॉक्टरांना आपली जाहिरात करता येत नाही. जनसंपर्क आणि रुग्णांवर इलाज करताना आलेले यश यावरच त्याची प्रसिद्धी आपोआपच होत असते, हे मला पक्के माहिती होते. यालाच त्याकाळी 'या डॉक्टरांचा लगेच गुण येतो' असे म्हणण्याची पद्धत आहे. त्यामुळे   उद्घाटनाच्याच्या आधी आठवडाभर मी आजूबाजूच्या सुमारे शंभर घरांमध्ये उद्घाटनानिमित्त ठेवलेल्या सत्यनारायण पूजेच्या तीर्थप्रसादाच्या निमंत्रण पत्रिका वाटल्या. 'निमंत्रण दिले की जायचेच' ही भावना त्याकाळी ठाम रुजलेली होती. साहजिकच हे सर्व लोक आठवणीने माझ्या उद्घाटनाला हजर होते. एवढे लोक येतील अशी माझ्या आई-वडिलांना कल्पना नव्हती. फारतर मित्र आणि नातेवाईक मिळून ५०-६० लोक येतील असे त्यांना वाटले होते. पण सुमारे ४००-४५० पाहुणे आल्याने तीर्थ आणि प्रसाद परत बनवावा लागला.
      या आलेल्या कुटुंबांपैकी जवळजवळ सर्व जण आजही संपर्कात आहेत. अधूनमधून का होईना ते माझ्याकडे सल्ला घ्यायला येतात. आजही दवाखान्यात नंबर लावून बसताना, "आम्ही डॉक्टरांचे पहिल्या दिवशीपासूनचे पेशंट्स" असे रिसेप्शनिस्टला आणि आजूबाजूला थांबलेल्या लोकांना अभिमानाने सांगतात. या साऱ्यांच्या प्रेमाने माझी प्रॅक्टिस पहिल्या सहा महिन्यातच खूप वाढली. आणि अनपेक्षितपणे मी शिवाजीनगर भागातील एक 'चांगला हातगुण असलेला डॉक्टर म्हणून अल्पावधीतच ओळखला जाऊ लागलो. 
      त्या ५ जानेवारीला तीर्थप्रसादाला आलेल्यांपैकी प्रत्येकाने माझी भेट घेऊन काही सूचना केल्या. काहींनी पुष्पगुच्छ दिले, काही जणांनी आहेरासारखी पाकिटे देऊ केली. (अर्थातच मी ती स्वीकारली नाहीत.) यामध्ये काही वडिलधाऱ्या व्यक्तींनी मनापासून केलेल्या सूचना अतिशय उपयुक्त ठरल्या. उदाहरणार्थ-
·         दवाखाना नऊला म्हणजे नऊलाच उघडला पाहिजे.
·         सुरुवातीला पेशंट्स नसले तरी पूर्णवेळ थांब. लोक जाता येता बघत असतात. दुपारी २ पर्यंत डॉक्टर असतो. मग वेळ आली की बरोबर आठवणीने येतात.
·         या भागातले दवाखाने रात्री नऊला बंद होतात, तुम्ही दहा पर्यंत थांबा
·         एखादी गरीब भिकारीण आली तरी तिला राणी असल्यासारखी वागवा. हे गरीबच आपले पेशंट्स असतात.
·         पैसे नसले तर औषध देऊ नका. त्या अमुक तमुक डॉक्टरकडे उधारी केलेल्या पाचशे जणांची यादी आहे. लोक उधारी ठेवतात आणि मग ती चुकवावी लागेल म्हणून डॉक्टर बदलतात.
·         कामाला माणसे जवळ राहणारी ठेवा. तुम्हाला उशीरा किंवा रात्री अपरात्रीपर्यंत दवाखाना चालू ठेवता येईल.
·         या भागात काही लोकांचे वर्चस्व आहे. त्यांचे खूप नातेवाईक आहेत. त्यांच्याशी संबंध चांगले ठेवा.
·         औषधांचे हिशेब व्यवस्थित ठेवा. कुणा औषधवाल्यांकडे तुमची काही उधारी ठेवू नका.
·         डॉक्टरला फोन पाहिजे. माझ्या ओळखीचे एकजण आहेत, तुम्हाला लगेच फोन मिळेल.
·         डॉक्टरला गाडी वापरली पाहिजे. सेकंडहॅण्ड का होईना एक कार घेऊन टाका. डॉक्टरच्या दवाखान्याबाहेत त्याची कार असली की डॉक्टर चांगला असे लोकांना वाटते.  
      यापैकी जवळजवळ सर्व सूचना मी पाळल्या. त्याचा मला व्यवसायात खरंच उपयोग झाला. मेडिकल कॉलेजमध्ये वर्गात सर्व पुस्तकातल्या आजारांचा परिचय होतो. त्यांचे उपचार समजतात. कॉलेजच्या क्लिनिकल टर्म्समध्ये प्रत्यक्ष रुग्णाशी बोलणे आणि तपासणे होते. पण व्यवसाय कसा करावा? रुग्णांच्या डॉक्टरांकडून काय अपेक्षा असतात, हे मला या 'गुरूंकडूनच' शिकायला मिळाले.
      रुग्ण तपासताना त्याचे म्हणणे नीट समजून घ्यावे लागते. आपल्या मनाने आधीच त्याचे निदान पक्के करायचे नसते. नाहीतर गोंधळ झालाच म्हणून समजा. व्यवसायाच्या सुरुवातीला घडलेला एक प्रसंग माझ्या मनावर याचे पक्के संस्कार करून गेला.
      मी दवाखाना सुरु केला त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता माझ्या घराची बेल वाजली. मी दार उघडले तर आमच्याच सोसायटीत राहणाऱ्या एक गुजराथी महिला उभी होती. त्यांचे नवीनच लग्न झाले होते आणि त्या गुजराथी मिश्रित मराठी बोलायच्या.
मी त्यांना आत बोलावले. " काय विशेष एवढ्या सकाळ सकाळी?"
"हो ना. माझ्या मिस्टरना बरे नाही"
"हो? काय होतेय त्यांना?" मी गडबडून विचारले.
"अरे, काल रात्रभर त्याला तरास होतोय"
"कसला त्रास?"
"अरे, रातभर सारखा संडासला जातेय तो?"
"अरे बापरे, किती वेळा गेला?"
"पन्नास-साठ वेळा तरी गेला असेल?" बाईंचा स्वर खूप घाबरलेला वाटला.
"मग अॅडमिट करायचे का त्यांना?" एवढे ५० जुलाब म्हणजे मला त्याचे डीहायड्रेशन दिसू लागले. यावर आपण काय करणार? असा विचारही मनात डोकावून गेला.
" नको. तुम्हीच काही तरी द्या."
"त्यांना एक तर इथे घेऊन या नाही तर मला घरी येऊन पाहावे लागेल त्यांना. त्यांना तपासावे लागेल, त्यांचे बीपी वगैरे पहावे लागेल." माझ्यातला फिजिशियन बोलू लागला.
" खूप थकून गेलाय तो. तुम्ही औषध द्या... नंतर जमलं तर आणते."
मी "ठीक आहे" म्हणालो आणि विचार करू लगलो. त्याकाळी असे खूप जुलाब झाले की लोमोटील नावाच्या गोळ्या द्यायचे. असे खूप जुलाब झाले की एका वेळेस २ गोळ्या आणि नंतर प्रत्येक जुलाबानंतर एक-एक अशा जुलाब थांबेपर्यंत द्याव्या, असा संकेत होता. पण ५०-६० वेळा माणूस संडासला गेलाय...म्हणून मी गोळ्या लिहून दिल्या आणि सांगितले,
"आत्ता २ गोळ्या आणि नंतर प्रत्येकवेळा संडासला जाऊन आल्यावर एकेक.. असं बरं वाटेपर्यंत... पण तरी काही त्रास जास्त झाला तर मला बोलवा नाहीतर उद्या घेऊन या"
बाईंनी प्रिस्क्रिप्शन घेतले आणि गेल्या.
साधारणतः तासाभराने त्यांच्या 'मिस्टर'ला घेऊन त्या पुन्हा आल्या... त्या गृहस्थांना मराठी उत्तम येत होते. त्यांच्या सौप्रमाणे गुजराथीमिश्रित नव्हते. त्यांना घरातल्या सोफ्यावर झोपवून तपासताना मी विचारले, "फारच गळून गेलेले दिसताय. आता गेल्या तासाभरात किती जुलाब झाले?"
हाताला बीपीचा पट्टा बांधलेल्या अवस्थेत रुग्ण महाशय ताडकन उठून बसले. म्हणाले,
"जुलाब? अरे मला जुलाब नाही होत."
"मग? मला तर सांगितले की तुम्ही रात्रभरात पन्नास-साठवेळा संडासला गेलात."
" अरे अविनाशभाई, मला कालपासून शौचाला होत नव्हती. सारखं वाटायचं आली... म्हणून मी जात होतो. पण होत नव्हती. मला कॉन्सटिपेशनचा त्रास आहे. दोन दिवस गावाला जाऊन आलो. उन्हात फिरलो. पाणी मिळाले नाही. म्हणून संडासला त्रास होतोय."
हे ऐकल्यावर माझ्याच पोटात गोळा आला.... कारण बाईने सांगितल्याप्रमाणे मी त्याला खूप जुलाब होतायत म्हणून औषध दिले होते. तरी मी चेहऱ्यावर काही न दाखवता त्यांना परत झोपवले. त्यांचे बीपी बघितले. आणि बाईना विचारले,
"मघाशी दिलेली औषधे घेतली का?"
नकारात्मक मान हलवत त्या म्हणाल्या, "दुकाने बंद होती. आता साडेनऊला उघडतील."
मी उसने अवसान आणत म्हणालो, "आता तपासल्यावर माझ्या लक्षात आले की औषधे बदलावी लागतील."
मी आधीची चिट्ठी ताब्यात घेतली आणि नव्याने "पोट साफ होण्याची औषधे लिहून दिली."
जाताना त्यांनी देऊ केलेली फी मी नाकारली. म्हणालो, "अहो शेजारधर्म आहे हा. तुम्ही मला लहानपणापासून पाहताय. तुमच्याकडून कशी फी घ्यायची?" मात्र मनात स्वतःशीच म्हणालो, "पेशंट तपासताना त्याच्या तक्रारी नीट समजून घ्याव्यात. भाषेतला, भावनेतला गोंधळ करू नये. हा धडा तुम्ही मला शिकवलात. त्याची गुरुदक्षिणा म्हणून मीच खरी तुम्हाला फी द्यायला पाहिजे"
गेल्या पस्तीस वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये माझ्या पेशंट्सने दिलेल्या अशा अनेक शिकवण्या आचरणात आणत माझी जडणघडण होत गेली हे मी अनेकदा मान्य करतो.   

-डॉ.अविनाश भोंडवे

(फॅमिली डॉक्टर)


  

Thursday, March 21, 2019

कशाला व्हायचे डॉक्टर?


परवा एका लग्नात माझ्या मित्राची मुलगी भेटली. मुंबईच्या एका नामवंत इस्पितळात ती एका सुपर स्पेशालिटी कोर्समध्ये सर्जन म्हणून काम करत होती. या इस्पितळाच्या उच्च दर्जाच्या वैद्यकीय सेवेमुळे, तिथल्या नामांकित डॉक्टर्समुळे हे रुग्णालय अखिल भारतातील एक प्रतिष्ठित रुग्णालय मानले जाते. 


साधारणतः वर्षापूर्वी ती मला अशीच भेटली होती, तेंव्हा उत्साहाने ती कशी सळसळत होती. तिच्या वाक्यावाक्यातून त्या इस्पितळात एकेक गोष्ट शिकण्यासाठी कसे अपार कष्ट करून घेतात, याचे कौतुक दिसत होते. तिच्या शब्दाशब्दातून स्वप्न साकारण्यातला तिचा आनंद जाणवत होता. ती म्हणत होती की त्या इस्पितळात दिवसातले १८-२० तास हाडाची काडे करून काम करावे जरी लागत असले, तरी तासनतास घालवून ती चिकाटीने काम करत होती. या अखंड परिश्रमाने तिच्या शस्त्रक्रियेत नैपुण्य आले होते. तिच्या कौशल्यांचे क्षितिज अमर्याद उंचावले होते.
पण परवा मी तिच्याशी बोललो तेंव्हा लक्षात आले की तिने स्वतःची जिद्द पूर्णपणे गमावली होती.
सकाळी ७ वाजता घराबाहेर पडायचे आणि रात्री १० वाजता घरी परतायचे आणि अंथरुणावर अंग टाकायचे. दुसऱ्या दिवशीचे चक्र पुन्हा सुरू करण्यासाठी परत पहाटे ५ वाजता दचकून जागे व्हायचे. तिला वाटले, काय चाललंय हे?  आपल्या कुटुंबियांबरोबरचा आणि यच्चयावत मित्रमंडळींसमवेतचा सारा संपर्क ती गमावून बसली होती. माणूस म्हणून तिचं अस्तित्व संपलं होतं, ती फक्त एक रोबॉट बनली होती. हॉस्पिटलच्या अंतर्गत चाललेले राजकारण आणि तिथल्या तथाकथित सामाजिक जीवनामध्ये अहोरात्र सामील झाल्यामुळे तिचे स्वतःचे जग हरवून गेले होते. 
आणि हे सगळं फक्त दरमहा ५० हजारांमध्ये. ती ज्या रुग्णालयात काम करत होती तिथल्या आयसीयूमध्ये दोन दिवस तिला जर राहावे लागले, तर तिला अक्षरशः औषधालाही  पैसे पुरणार नव्हते.
तिच्या डोळ्यातले पूर्वीचे तेज विझले होते. मला सांगावेसे वाटले तिला की डोंगरावर चढूनजाताना दमायला होतेच; पण तिथे गेल्यावर आजूबाजूचे जग जेंव्हा आपण खुजे झालेले पाहतो ना, तेंव्हा हे कष्ट सोसून आपली महत्वाकांक्षा पूर्ण केल्याचे समाधान मिळते. कदाचित तुझ्या वयाच्या चाळिशीत, तुझ्या इंजिनिअर किंवा आयटी मधल्या मित्रांना आता जो पगार मिळतोय तेवढे पैसे तुला नक्की मिळू लागतील.

पण मी काहीच बोललो नाही.
मध्ये माझा एक वर्गमित्र भेटला. तो सरकारी सेवेत होता. मुख्यत्वे ग्रामीण भागात तीस वर्षे नोकरी करून त्याने स्वेच्छानिवृत्ती घेतली. तेंव्हा त्याच्या बँकेत फक्त १५००० रुपये शिल्लक होते. त्याने कुठल्याही फॉरीन ट्रिपा केल्या नव्हत्या, भारतातल्या नामांकित थंड हवेच्या ठिकाणीसुद्धा तो जाऊ शकला नव्हता. तो अजूनही भाड्याच्या घरात राहतो आणि कार तर सोडाच पण दाग-दागिने किंवा कुठलीही किमती वस्तू तो आयुष्यात स्वतःच्या संसारासाठी घेऊ शकलेला नाही. त्याचा मोबाईल दुरुस्त करायला जेंव्हा तो एका टपरीवजा दुकानात गेला, तेंव्हा गप्पांमध्ये त्या मोबाईल दुकानदाराने त्याची कमाई सांगितली. ती डॉक्टरच्या पगारापेक्षा दुप्पट होती.
त्याने मला सांगितले, तुझ्या आय.एम.ए.मधल्या आपल्या मित्रांना माझा संदेश दे. "वैद्यकीय सेवा म्हणजे समाजसेवा. डॉक्टरांनी पैशांचा नव्हे रुग्णाच्या प्राणाचा विचार करायचा असतो, अशा आवाहनाला भुलून जाऊ नका. ते एक इमोशनल ब्लॅकमेलिंग आहे. माझ्यासारखे भावनिक मूर्ख होऊ नका. स्वतःला आणि आपल्या संसाराच्या, कुटुंबियांच्या वर्तमानाला आणि भविष्याला जपा. कारण तुमच्या आयुष्याच्या अखेरीस तुमच्या सेवेची कुणीही कदर करत नाही, पण तुमची एक जरी चूक झाली तरी तुमचे हातपाय तोडले जातील आणि डोके फोडले जाईल" आणि माझ्या ध्यानात आले की मी पूर्णपणे त्याच्याशी सहमत आहे.
वैद्यकीय क्षेत्रात तीन दशके सेवा केल्यावर तो एका सामान्य टपरीवाल्याइतके पैसे आपल्या कौटुंबिक गरजांसाठी मिळवू शकत नाही?  मग त्याने एवढ्या खस्ता खाऊन एमबीबीएस होण्याची आणि डॉक्टरी करण्याची शिवाय सेवा म्हणून ग्रामीण भागात जाण्याची काय गरज होती?
आज भारतामध्ये डॉक्टरांनी प्रामाणिकपणे व्यावसायिक कष्ट करून पैसे मिळवणे हा एक प्रकारचा गुन्हा समजला जातोय. डॉक्टर समाजाला लुटतायत असा प्रचार केला जातो. पण त्याच वेळी न्यायाधीश, वकील, सरकारी अधिकारी, सरकारी कंत्राटदार, सिनेनट आणि अशिक्षित राजकारणी असंख्य घोटाळे करून कोट्यवधी रुपये मिळवतात त्याकडे पूर्णपणे डोळेझाक केली जाते आहे. तर मग डॉक्टर बनण्यासाठी इच्छुक असलेले आजचे सर्व विद्यार्थी डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहण्याचा वेडगळपणा करतायत असं  मानायला नको का?  का बनावे त्यांनी डॉक्टर्स? 
आजच्या डॉक्टर होऊ इच्छिणाऱ्या तुमच्या आमच्या मुलांकडून आणि विद्यार्थ्यांकडून समाजाची तसंच राजकारण्यांची अपेक्षा पाह्यला गेलो तर काय लक्षात येते? 
१. खेड्यांचा विकास करायला जर सरकार अपयशी ठरले आहे, तिथली वैद्यकीय सेवा कुठल्याही इन्फ्रास्ट्रक्चरची सुविधा अपेक्षित न ठेवता आपण का सांभाळावी?
२. तुम्ही गरीब रुग्णांचे ऑपरेशन खाजगी रुग्णालयात करा. पण ६०,००० रुपयांच्या शस्त्रक्रियेसाठी सरकारकडून ६५० रुपयेच मिळतील.
३. अशी जवळजवळ मोफत सेवा ग्रामीण देण्यासाठी वकील, इंजिनियर यांच्यावर सक्ती नाही. मोबाईलच्या, पेट्रोल-डिझेलच्या आणि अशा इतर गोष्टींच्या दरात कसलीही कपात नाही. कारण वैद्यकीय सेवा ही समाजसेवा आहे आणि प्राण वाचवणारी आवश्यक सेवा आहे. इतर सेवा या गरजा नाहीत. सेवेचा मक्ता फक्त डॉक्टरांचाच आहे. 
४. वर्षानुवर्षे पारखून तुम्ही जी औषधे वापरता, ती जगातील उत्तम फार्मास्युटिकल कंपन्यांची औषधे अजिबात वापरू नका. त्या ऐवजी दर्जाची खात्री नसलेल्या, जेनेरिक कंपन्यांचे प्रॉडक्ट्स लिहा. मात्र रुग्णांना जर बरे वाटले नाही तर त्याची जबाबदारी तुमची.
५. शक्य तितक्या जास्त रुग्णांना मदत करण्याची नैतिक जबाबदारी डॉक्टरांवरच असते.  आणि म्हणून त्यांनी स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतांपेक्षा जास्त काम करायचे असते.


६. जेव्हा काही दुर्घटना घडते आणि रुग्ण मृत्युमुखी पडतो, तेंव्हा औषधांच्या सदोषतेकडे किंवा उपलब्ध नसलेल्या सोयींकडे लक्ष द्यायचे नसते. डॉक्टरांनीच सारे निस्तरायचे असते. कारण चांगली औषधे डॉक्टर्स फक्त स्वतःच्या फायद्यासाठी वापरतात असे ओरडून ओरडून सांगितले जाते.
७. रुग्ण बरा झाला तर डॉक्टरचं ते कर्तव्यच असते. पण नाही झाला, तर त्याचे डोके फोडायचे आणि त्याचा दवाखाना. हॉस्पिटल उद्धवस्त करायचे असते.
८. डॉक्टरांच्या उपचारा दरम्यान रुग्ण दगावला तर तो आजाराचा दोष नाही, डॉक्टरांचाच आहे. असे सांगायला राष्ट्रीय वाहिन्यांवर मोठमोठ्या सेलेब्रिटी, धुरंधर राजकारणी आणि डॉक्टरांचा पिच्छा पुरवणारे स्वयंघोषित रुग्णसहयोगी तयारच असतात.
९. डॉक्टरांनी त्यांच्यावर अन्याय झाला तर संप करायचा नाही. 
आज परिस्थिती अशी आहे, की अनेक वर्षे डॉक्टरी करत राहिल्यामुळे, मनात असले तरी ती अनेकांना सोडता येत नाही. कारण जर वैद्यकीय ज्ञान वगळता आपल्याकडे कुठलेही पैसे मिळवायचे स्किल नाही. फारतर कुठेतरी लेखनिक किंवा कार ड्रायव्हर म्हणून काम करण्याशिवाय गत्यंतरच नाही, अशी अनेकांची परिस्थिती आहे. 
मग सांगा पाहू आपल्या मुलांनी तरी या गोष्टी सहन करत का आपली डोकी फोडून घ्यायची?

Saturday, March 9, 2019

भाऊ माझं चुकलं

भाऊ माझं चुकलं
-डॉ.अविनाश भोंडवे
'चुकीच्या औषधाने रुग्णाचा मृत्यू'
'चुकीच्या शस्त्रक्रियेने रुग्ण दगावला'

'चुकीच्या इंजेक्शनमुळे पाच पेशंट्स अत्यवस्थ'
अशा अर्थाच्या बातम्या आपण वर्तमानपत्रात '२४ XX ३६५'दा वाचत असतो. अशा बातम्या सांगताना टेलिव्हिजनच्या काही वाहिन्यांवर तर डॉक्टरांवर स्वैर मुक्ताफळं उधळताना, त्यातल्या वृत्तनिवेदकाच्या जिभेवर हुताशनी पौर्णिमा उन्मुक्तपणे ऱ्होंबा-सोम्बा नृत्य करत असते.
वर्तमानपत्रे आणि मिडियाला अभिप्रेत असलेली चुकीची औषधे, चुकीची ऑपरेशन्स यातला तथ्यांश लक्षात घेतला, तर त्यांना औषधे देताना, प्रोसीजर करताना झालेल्या चुका अभिप्रेत असाव्यात असं लक्षात येतं. पण बातम्यांमध्ये पिवळे-लाल रंग भरून टीआरपी वाढवण्याच्या हव्यासापोटी हे शब्द जाणूनबुजून पुन्हा पुन्हा वापरले जातात, हेसुध्दा लपून राहत नाही.
तसं पाहिला गेलं तर, वैद्यकशास्त्र हे अबोध आणि अपूर्ण शास्त्र आहे.यात २+२=४, असे उत्तर अनेकदा येताच नाही. 'एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन;चा कितीही उदोउदो केला, तरी अनेक गोष्टी या ठोकताळ्यांवर आणि पूर्वानुभवावर आधारित असतात. त्यामुळे प्रत्येक डॉक्टरांच्या आयुष्यात लहानमोठ्या चुका अधूनमधून घडतच असतात. १९९९ साली 'इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिन' या स्वायत्त अमेरिकन संस्थेने वैद्यकीय उपचारातील चुकांनी मृत्युमुखी पडलेल्या तब्बल ९८००० रुग्णांची पहाणी प्रसिद्ध केली होती. काही काळापूर्वी रीडर्स डायजेस्टनेदेखील 'माझ्या मेडिकल प्रॅक्टिसमधील चुका' असा एक लेखसंग्रह एका अंकात प्रसिद्ध केला होता.
परदेशात ठीक आहे, पण आपल्या देशात जर अशा चुका आपण कबूल करत गेलो, तर काय होईल? आपण डॉक्टर मित्रांच्या बैठकीतसुध्दा आपल्या चुका मान्य करत नाही. कारण अगदी सुरुवातीला व्हेनमध्ये सुई घालताना डबल पंक्चर होऊन आयव्ही आउट जाण्यापासून ही सुरुवात होते. पुढे अनेक गोष्टी घडतात. कधी अॅक्ट ऑफ ओमिशन तर कधी कमिशन…….. ......पण चुका या होतच राहतात. क्रिकेटमध्ये जसा स्ट्राईक रेट मोजला जातो, तसा एकुणात होणाऱ्या चांगल्या आणि यशस्वी उपचारांमध्ये या चुका झाकल्या जातात.
मध्यंतरी एका नामवंत वृत्तपत्रात आपल्याच एका डॉक्टर लेखकांनी असे प्रतिपादन केले होते की डॉक्टरांनी आपली चूक रुग्णापाशी कबूल करावी, म्हणजे तो त्वरित म्हणेल, "डॉक्टर तुमच्या हातात माझा जीव सोपवलाय, चूक झाली तरी तुम्हीच मला जगवणार" पण हे खरेच असे होईल का?
मृत्यूपंथाला लागलेल्या रुग्णाला इस्पितळात भरती केल्यावर त्याच्या आजाराच्या गांभीर्याने मरण आले, तरी त्या डॉक्टरलाच जबाबदार धरले जाते. रस्त्यावरच्या अपघातात जबर जखमी झालेली व्यक्ती उपचारादरम्यान दगावली, तर अपघातात त्या माणसाला ठोकणाऱ्या वाहनचालकाला नव्हे तर त्या रुग्णालयातल्या डॉक्टरांना आणि त्यांच्या सेवेला दोष दिला जातो. बेशुद्ध आणि गंभीर अवस्थेतल्या रुग्णाचे प्राणोत्क्रमण झाले तर ती चूक डॉक्टरांच्या माथी मारली जाते.
गेल्या काही वर्षात अशाच न घडलेल्या चुकांसाठी डॉक्टरांचे दवाखाने फोडण्यात आले, रुग्णालयांची मनसोक्त तोडफोड करण्यात आली, असंख्य डॉक्टरांना यथेच्छ धोपटण्यात आले. मग जर संत बनून आपली चूक व्यक्त करणाऱ्या डॉक्टरचे काय होईल?
पदोपदी ठोकर खाणाऱ्या डॉक्टरांच्या विरोधात एकीकडून समाज आणि समाजकंटक, दुसरीकडून वर्तमानपत्रे आणि मिडीया, तिसरीकडून सर्व माननीय लोकसेवक, आमदार, खासदार यांची आगपाखड चालूच असते. या साऱ्याची फिर्याद मायबाप सरकारकडे करण्यातही काही हशील नसते; कारण सरकार दर पाच-सहा महिन्यांनी 'डॉक्टरांना फटके घालायला आता नवा कुठला कायदा आणावा?' या विवंचनेत गुंग असते. अशा परिस्थितीत उपचारांमध्ये चूक झाली, असे एखाद्या डॉक्टरने सांगितले, तर सांगणाऱ्या प्रामाणिक डॉक्टरचा फोटोच त्याच्या नर्सिग होममध्ये कागदी फुलांचा हार घालून टांगलेला दिसेल.
कित्येकदा आपल्याला जी गोष्ट चूक म्हणून वाटते, ती चूक असेलच असंही नाही. आयएमएच्या मेडिको-लीगल सेलशी संपर्क साधलात, तर ती कदाचित चूक नाही, हेदेखील लक्षात येईल. त्यामुळे अगदी 'रेस इस्पा लोकिटा' मधली घटना नसेल, तर घाईघाईने आपली चूक नसताना का कबूल करावी?

शेवटी काय? एकतर चूक करू नका, केल्यास जाहीर कबूल करू नका. सल्ला घ्या. आपल्या यशामुळे अग्निमांद्य होणारे असंख्य 'हितमित्र' आजूबाजूला असतात. वैद्यकीय सेवेतील रात्र नेहमीच वैऱ्याची असते. डॉक्टरराजा सावध रहा. उगीचच 'भाऊ माझं चुकलं' म्हणायची घाई करू नका.