Showing posts with label Government doctors. Show all posts
Showing posts with label Government doctors. Show all posts

Thursday, March 21, 2019

कशाला व्हायचे डॉक्टर?


परवा एका लग्नात माझ्या मित्राची मुलगी भेटली. मुंबईच्या एका नामवंत इस्पितळात ती एका सुपर स्पेशालिटी कोर्समध्ये सर्जन म्हणून काम करत होती. या इस्पितळाच्या उच्च दर्जाच्या वैद्यकीय सेवेमुळे, तिथल्या नामांकित डॉक्टर्समुळे हे रुग्णालय अखिल भारतातील एक प्रतिष्ठित रुग्णालय मानले जाते. 


साधारणतः वर्षापूर्वी ती मला अशीच भेटली होती, तेंव्हा उत्साहाने ती कशी सळसळत होती. तिच्या वाक्यावाक्यातून त्या इस्पितळात एकेक गोष्ट शिकण्यासाठी कसे अपार कष्ट करून घेतात, याचे कौतुक दिसत होते. तिच्या शब्दाशब्दातून स्वप्न साकारण्यातला तिचा आनंद जाणवत होता. ती म्हणत होती की त्या इस्पितळात दिवसातले १८-२० तास हाडाची काडे करून काम करावे जरी लागत असले, तरी तासनतास घालवून ती चिकाटीने काम करत होती. या अखंड परिश्रमाने तिच्या शस्त्रक्रियेत नैपुण्य आले होते. तिच्या कौशल्यांचे क्षितिज अमर्याद उंचावले होते.
पण परवा मी तिच्याशी बोललो तेंव्हा लक्षात आले की तिने स्वतःची जिद्द पूर्णपणे गमावली होती.
सकाळी ७ वाजता घराबाहेर पडायचे आणि रात्री १० वाजता घरी परतायचे आणि अंथरुणावर अंग टाकायचे. दुसऱ्या दिवशीचे चक्र पुन्हा सुरू करण्यासाठी परत पहाटे ५ वाजता दचकून जागे व्हायचे. तिला वाटले, काय चाललंय हे?  आपल्या कुटुंबियांबरोबरचा आणि यच्चयावत मित्रमंडळींसमवेतचा सारा संपर्क ती गमावून बसली होती. माणूस म्हणून तिचं अस्तित्व संपलं होतं, ती फक्त एक रोबॉट बनली होती. हॉस्पिटलच्या अंतर्गत चाललेले राजकारण आणि तिथल्या तथाकथित सामाजिक जीवनामध्ये अहोरात्र सामील झाल्यामुळे तिचे स्वतःचे जग हरवून गेले होते. 
आणि हे सगळं फक्त दरमहा ५० हजारांमध्ये. ती ज्या रुग्णालयात काम करत होती तिथल्या आयसीयूमध्ये दोन दिवस तिला जर राहावे लागले, तर तिला अक्षरशः औषधालाही  पैसे पुरणार नव्हते.
तिच्या डोळ्यातले पूर्वीचे तेज विझले होते. मला सांगावेसे वाटले तिला की डोंगरावर चढूनजाताना दमायला होतेच; पण तिथे गेल्यावर आजूबाजूचे जग जेंव्हा आपण खुजे झालेले पाहतो ना, तेंव्हा हे कष्ट सोसून आपली महत्वाकांक्षा पूर्ण केल्याचे समाधान मिळते. कदाचित तुझ्या वयाच्या चाळिशीत, तुझ्या इंजिनिअर किंवा आयटी मधल्या मित्रांना आता जो पगार मिळतोय तेवढे पैसे तुला नक्की मिळू लागतील.

पण मी काहीच बोललो नाही.
मध्ये माझा एक वर्गमित्र भेटला. तो सरकारी सेवेत होता. मुख्यत्वे ग्रामीण भागात तीस वर्षे नोकरी करून त्याने स्वेच्छानिवृत्ती घेतली. तेंव्हा त्याच्या बँकेत फक्त १५००० रुपये शिल्लक होते. त्याने कुठल्याही फॉरीन ट्रिपा केल्या नव्हत्या, भारतातल्या नामांकित थंड हवेच्या ठिकाणीसुद्धा तो जाऊ शकला नव्हता. तो अजूनही भाड्याच्या घरात राहतो आणि कार तर सोडाच पण दाग-दागिने किंवा कुठलीही किमती वस्तू तो आयुष्यात स्वतःच्या संसारासाठी घेऊ शकलेला नाही. त्याचा मोबाईल दुरुस्त करायला जेंव्हा तो एका टपरीवजा दुकानात गेला, तेंव्हा गप्पांमध्ये त्या मोबाईल दुकानदाराने त्याची कमाई सांगितली. ती डॉक्टरच्या पगारापेक्षा दुप्पट होती.
त्याने मला सांगितले, तुझ्या आय.एम.ए.मधल्या आपल्या मित्रांना माझा संदेश दे. "वैद्यकीय सेवा म्हणजे समाजसेवा. डॉक्टरांनी पैशांचा नव्हे रुग्णाच्या प्राणाचा विचार करायचा असतो, अशा आवाहनाला भुलून जाऊ नका. ते एक इमोशनल ब्लॅकमेलिंग आहे. माझ्यासारखे भावनिक मूर्ख होऊ नका. स्वतःला आणि आपल्या संसाराच्या, कुटुंबियांच्या वर्तमानाला आणि भविष्याला जपा. कारण तुमच्या आयुष्याच्या अखेरीस तुमच्या सेवेची कुणीही कदर करत नाही, पण तुमची एक जरी चूक झाली तरी तुमचे हातपाय तोडले जातील आणि डोके फोडले जाईल" आणि माझ्या ध्यानात आले की मी पूर्णपणे त्याच्याशी सहमत आहे.
वैद्यकीय क्षेत्रात तीन दशके सेवा केल्यावर तो एका सामान्य टपरीवाल्याइतके पैसे आपल्या कौटुंबिक गरजांसाठी मिळवू शकत नाही?  मग त्याने एवढ्या खस्ता खाऊन एमबीबीएस होण्याची आणि डॉक्टरी करण्याची शिवाय सेवा म्हणून ग्रामीण भागात जाण्याची काय गरज होती?
आज भारतामध्ये डॉक्टरांनी प्रामाणिकपणे व्यावसायिक कष्ट करून पैसे मिळवणे हा एक प्रकारचा गुन्हा समजला जातोय. डॉक्टर समाजाला लुटतायत असा प्रचार केला जातो. पण त्याच वेळी न्यायाधीश, वकील, सरकारी अधिकारी, सरकारी कंत्राटदार, सिनेनट आणि अशिक्षित राजकारणी असंख्य घोटाळे करून कोट्यवधी रुपये मिळवतात त्याकडे पूर्णपणे डोळेझाक केली जाते आहे. तर मग डॉक्टर बनण्यासाठी इच्छुक असलेले आजचे सर्व विद्यार्थी डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहण्याचा वेडगळपणा करतायत असं  मानायला नको का?  का बनावे त्यांनी डॉक्टर्स? 
आजच्या डॉक्टर होऊ इच्छिणाऱ्या तुमच्या आमच्या मुलांकडून आणि विद्यार्थ्यांकडून समाजाची तसंच राजकारण्यांची अपेक्षा पाह्यला गेलो तर काय लक्षात येते? 
१. खेड्यांचा विकास करायला जर सरकार अपयशी ठरले आहे, तिथली वैद्यकीय सेवा कुठल्याही इन्फ्रास्ट्रक्चरची सुविधा अपेक्षित न ठेवता आपण का सांभाळावी?
२. तुम्ही गरीब रुग्णांचे ऑपरेशन खाजगी रुग्णालयात करा. पण ६०,००० रुपयांच्या शस्त्रक्रियेसाठी सरकारकडून ६५० रुपयेच मिळतील.
३. अशी जवळजवळ मोफत सेवा ग्रामीण देण्यासाठी वकील, इंजिनियर यांच्यावर सक्ती नाही. मोबाईलच्या, पेट्रोल-डिझेलच्या आणि अशा इतर गोष्टींच्या दरात कसलीही कपात नाही. कारण वैद्यकीय सेवा ही समाजसेवा आहे आणि प्राण वाचवणारी आवश्यक सेवा आहे. इतर सेवा या गरजा नाहीत. सेवेचा मक्ता फक्त डॉक्टरांचाच आहे. 
४. वर्षानुवर्षे पारखून तुम्ही जी औषधे वापरता, ती जगातील उत्तम फार्मास्युटिकल कंपन्यांची औषधे अजिबात वापरू नका. त्या ऐवजी दर्जाची खात्री नसलेल्या, जेनेरिक कंपन्यांचे प्रॉडक्ट्स लिहा. मात्र रुग्णांना जर बरे वाटले नाही तर त्याची जबाबदारी तुमची.
५. शक्य तितक्या जास्त रुग्णांना मदत करण्याची नैतिक जबाबदारी डॉक्टरांवरच असते.  आणि म्हणून त्यांनी स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतांपेक्षा जास्त काम करायचे असते.


६. जेव्हा काही दुर्घटना घडते आणि रुग्ण मृत्युमुखी पडतो, तेंव्हा औषधांच्या सदोषतेकडे किंवा उपलब्ध नसलेल्या सोयींकडे लक्ष द्यायचे नसते. डॉक्टरांनीच सारे निस्तरायचे असते. कारण चांगली औषधे डॉक्टर्स फक्त स्वतःच्या फायद्यासाठी वापरतात असे ओरडून ओरडून सांगितले जाते.
७. रुग्ण बरा झाला तर डॉक्टरचं ते कर्तव्यच असते. पण नाही झाला, तर त्याचे डोके फोडायचे आणि त्याचा दवाखाना. हॉस्पिटल उद्धवस्त करायचे असते.
८. डॉक्टरांच्या उपचारा दरम्यान रुग्ण दगावला तर तो आजाराचा दोष नाही, डॉक्टरांचाच आहे. असे सांगायला राष्ट्रीय वाहिन्यांवर मोठमोठ्या सेलेब्रिटी, धुरंधर राजकारणी आणि डॉक्टरांचा पिच्छा पुरवणारे स्वयंघोषित रुग्णसहयोगी तयारच असतात.
९. डॉक्टरांनी त्यांच्यावर अन्याय झाला तर संप करायचा नाही. 
आज परिस्थिती अशी आहे, की अनेक वर्षे डॉक्टरी करत राहिल्यामुळे, मनात असले तरी ती अनेकांना सोडता येत नाही. कारण जर वैद्यकीय ज्ञान वगळता आपल्याकडे कुठलेही पैसे मिळवायचे स्किल नाही. फारतर कुठेतरी लेखनिक किंवा कार ड्रायव्हर म्हणून काम करण्याशिवाय गत्यंतरच नाही, अशी अनेकांची परिस्थिती आहे. 
मग सांगा पाहू आपल्या मुलांनी तरी या गोष्टी सहन करत का आपली डोकी फोडून घ्यायची?