Sunday, March 15, 2020

डॉ.ह.वि.सरदेसाई: आदर्श डॉक्टर, डॉक्टरांचे आदर्श


डॉक्टर तुम्हाला पाहिलं की निम्मा आजार दूर होतो’, असं बऱ्याचदा रुग्ण आपल्या डॉक्टरांना म्हणतात. पण ज्यांना नुसते पाहिल्यावर निम्माच काय साराच आजार पळून जातो, असं रुग्णांना निश्चित वाटतं, असे धन्वंतरी म्हणजे विख्यात फिजिशियन डॉ. .वि.सरदेसाई! १९६० सालापासून आजपावेतो म्हणजे एका अर्धशतकाहूनही चार वर्षे अधिक काळ, केवळ पुण्यातीलच नव्हे तर दूरदूरच्या गावातून येणारे रुग्ण या साक्षात्काराचा अनुभव घेत आहेत.गेल्या चोपन्न वर्षात कित्येक रुग्णांच्या पाच पिढ्यांना त्यांनी आपली सेवा पुरविली आहे. 



गोरापान रंग, रुग्णांना आश्वासक वाटणारं प्रसन्न स्मितहास्य, नजरेमधील अपरंपार प्रेमळपणा, अपरंपार उल्हासान ओसंडून वाहणारी देहबोली, पाहताच रुग्णांचंच काय पण आजूबाजूच्या इतर डॉक्टरांचं, विद्यार्थ्याचं मन एका चैतन्यानं भरून जातं. डॉ..वि.सरदेसाईंचे व्यक्तिमत्व, त्यांची वैद्यकीय सेवेची पद्धत, त्यांची जीवनशैली, व्यावसायिक नैतिकता  आणि त्यांचे आरोग्यविषयक वैद्यकीय विचार हे सारे रुग्णांना, साऱ्या डॉक्टर वर्गाला आणि संपूर्ण   समाजाला एक अनन्यसाधारण आदर्श आहेत.
आलेल्या प्रत्येक रुग्णाच्या आजाराचा इत्थंभूत वैद्यकीय इतिहास विचारून, आवश्यक त्या शारीरिक चाचण्या करून, डॉ.सरदेसाईंचे रुग्णाला दिले जाणारे प्रिस्क्रिप्शन म्हणजे एक देखणे लेणे असते. पांढऱ्या स्वच्छ लेटरहेडवर, अत्यंत सुवाच्य अशा अक्षरात, नजरेत भरणाऱ्या दिमाखदार मोरपंखी शाईत ते लिहितात. प्रिस्क्रिप्शनवर रुग्णाचे नांव ते शुद्ध मराठीमध्ये म्हणजे देवनागरी लिपीत लिहितात. विशेष म्हणजे त्यावर इंग्रजी दिनांक न टाकताश्रावण शुद्ध ७,शके १९३५अशी मराठी तिथी लिहितात. प्रत्येक औषधाखाली रुग्णाला समजेल अशा पद्धतीने, ते कसे कसे घ्यावे हे मराठीत विषद केलेले असते. त्यानंतर त्याने करावयाचे व्यायाम आणि पथ्ये नमूद करून चिट्ठीच्या शेवटीहणमंत वि.सरदेसाईअशी मराठीमध्ये स्वाक्षरी असते.
आजूबाजूचे एकूण एक वैद्यकीय व्यावसायिक इंग्रजीमधून प्रिस्क्रिप्शन लिहीत असताना तुम्ही मराठीतच का लिहिता असे विचारल्यावर ते म्हणतात,  माझ्या पेशंट्समध्ये मराठी न समजणारे लोक एक टक्कासुद्धा नाहीत, मग मी ते मराठीतूनच का लिहू नये? आजही खेड्यापाड्यातील बहुसंख्य लोक मराठी दिनदर्शिकेचा वापर करतात.चिठ्ठीवरचे माझे वळणदार अक्षर माझ्या पेशंट्सना माझ्या सूचना समजायला सोप्या पडतात.” वैद्यकीय प्रिस्क्रिप्शन कसे असावे आणि कसे लिहावे याचा एक आगळा वेगळा आदर्श नमुना म्हणून आजही त्यांची वाखाणणी होते.
साऱ्या जगाला आरोग्याचा सल्ला देणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकाची स्वतःची जीवनशैलीदेखील आरोग्य जोपासणारी हवी, हे डॉ.सरदेसाईंनी अनेक वर्षे नित्यनियमाने जोपासलेल्या त्यांच्या स्वतःच्या दिनक्रमाने दाखवून दिले आहे. रात्री नऊ वाजता झोपणे, पहाटे साडेतीनला उठणे, त्यानंतर १०८ सूर्यनमस्कार घालणे हे त्यांनी तीस-चाळीस वर्षे पाळले. दवाखान्याच्या वेळा, जहांगीर हॉस्पिटल, ससून हॉस्पिटल या इस्पितळातल्या त्यांच्या राउंडस, बी,जे.मेडिकल कॉलेजमधील त्यांची विद्यार्थ्यांसाठी व्याख्याने, इतर सामाजिक कार्ये आणि विविध वैद्यकीय विषयावरील जाहीर सभेतील त्यांची भाषणे या साऱ्या व्यापात त्यांनी स्वतःच्या आरोग्यासाठी खाण्यापिण्याच्या वेळा, व्यायाम, विश्रांती, वाचन-लेखन-मनन-चिंतन हे सारे त्यांनी काटेकोरपणे पाळले. आपल्या कामाच्या पसाऱ्यात आणि पैशापाठी धावताना आपल्या आरोग्याचे मातेरे करून घेणाऱ्या, आमच्या आजच्या पिढीच्या डॉक्टरांना आणि इतर व्यावसायिकांना यातली कुठलीच गोष्ट नीट जमत नाही. यादृष्टीने या सगळ्यांनाच त्यांची जीवनशैली ललामभूत ठरावी.

आजच्या जगात स्वतःचा व्यवसाय उत्तम चालला असेल तर सामाजिक बांधिलकी मानून आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्यांचा सर्व समाजाला फायदा व्हावा यासाठी काही करण्यास डॉक्टरांना तसेच इतर व्यावसायिकांना रस नसतो.  बरेवाईट स्वार्थी उपक्रम  करून अधिकाधिक पैसा मिळवणे आणि काहीतरी करून सेलेब्रिटी होणे याकरिता करण्याकडे अनेकांचा कल आहे. अशावेळी वैद्यकीय व्यवसाय उत्तम प्रकारे सुरू असतानाजे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी शिकवावे, शहाणे करून सोडावे, सकळ जन I’ या रामदासी उक्तीप्रमाणे डॉ..वि.सरदेसाईंनी कुठल्याही आर्थिक मोबदल्याची अपेक्षा न ठेवता, आरोग्य, व्यायाम, योग, मनःशांती अशा हजारो विषयांवर अगणित व्याख्याने दिली.
त्यांचे पहिले व्याख्यान १९६१ साली वसंत व्याख्यानमालेत झाले. त्यावेळेस  पुण्यातील नामवंत एका डॉक्टरांनी त्यांना बोलावून सांगितले की, “तुम्ही ते व्याख्यान देऊ नका. तिथे असे अनेक लोक येतील, तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारून भंडावून सोडतील आणि तुमची हुर्यो करतील, तुम्हाला पळवून लावतील.” प्रसंग मोठा बाका होता,पण तरीही स्वतःच्या ज्ञानावर आणि अभ्यासावर असलेला विश्वास आणि ठाम निश्चय यांना शिरोधार्य मानून त्यांनी ते निमंत्रण स्वीकारले. त्या दिवशी त्यांचे ते व्याख्यान सर्व श्रोत्यांना विलक्षण आवडले. त्या काळात आरोग्याबाबतीतील अशास्त्रीय समजुतींचा पगडा आपल्या लोकांवर खूप होता, आजही तो काही अंशाने आहे. अशा जाहीर भाषणामुळे लोकांचे प्रबोधन आपण आपल्या भाषणातून, वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांमधील लेखांतून, आरोग्यावरील विविध पुस्तकांतून करावा या त्यांच्या निश्र्चयाला चालना मिळाली. आरोग्याबाबत विचारपरिवर्तनाचं त्यांचं हे कार्य वैद्यकीय सेवेसमवेत आजतागायत चालू आहे.
डॉ..वि.सरदेसाईंच्या जाहीर व्याख्यानांप्रमाणेच त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी ते घेत असलेल्या    न्यूरॉलोजीविषयक व्याख्यानांच्या  मालिकांची आठवण आज नामवंत वैद्यकीय तज्ञ म्हणून ओळखले जाणारे त्यांचे अनेक विद्यार्थी काढतात. ही व्याख्याने सकाळी सात वाजता व्हायची, तन्मयतेने आणि पूर्ण एकाग्रतेने ऐकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जथ्याने बी.जे.मेडिकल कॉलेजच्या वर्गाबाहेरील पॅसेजेससुद्धा त्यावेळी ओसंडून वाहायची. 
वैद्यकीय विषयावरील व्याख्यानांबरोबरच त्यांनी  अनेक वैद्यकीय विषयांवर लेख आणि पुस्तके लिहिली. वैद्यकीय विषय सोडता ते कधीही इतर विषयांवर बोलत नाहीत आणि अशा गोष्टींवर कुठलेही मतप्रदर्शन करीत नाहीत. लिखाणसुद्धा ते फक्त वैद्यकीय विषयांवरच करतात. “ज्या विषयात माझा अभ्यास आहे, ज्ञान आहे, अधिकार आहे त्यावरच आपण बोलावे आणि लिहावे, हे तत्व म्हणून मी पाळत आलो आहे.” असे ते नेहमी म्हणतात. ‘घरोघरी ज्ञानेश्वर जन्मतीया बालसंगोपनाच्या  विषयावरील त्यांचं भाषण, किर्लोस्करांनी ऐकल्यावर या विषयांवर लेखमाला त्यांनी किर्लोस्कर मासिकात छापली. ती खूप लोकप्रिय झाली. त्याचेच नंतर पुस्तक झाले आणि तेदेखील खूपच प्रसिद्ध झाले. त्यानंतर आजपावेतो त्यांनी सत्तावीस पुस्तके लिहिली आहेत. त्यामध्ये शारीरिक व मानसिक व्यायाम,पथ्य,आहार,स्वच्छता, औषधांचे गुणधर्म अशा अनेकविध विषयावरील पुस्तकांचा समावेश आहे.
त्यांची पुस्तके वाचून असंख्य वाचकांनी त्यांच्या ज्ञानात भर पडल्याचे तर सांगितलेच ,पण त्यांच्या आरोग्यविषयक दृष्टिकोनातसुद्धा फरक झाल्याचे सांगितले आहे.आजदेखील त्यांच्या एखाद्या नियतकालिकेत आलेल्या लेखाबद्दल अनेक रुग्ण त्यांना  फोन करतात, दवाखान्यात येऊन सांगतात. त्यांच्याकडे त्या पुस्तकांची विचारणा करून ती आवर्जून वाचतात. “ही सारी पुस्तके लिहिताना मला त्या विषयाचे सखोल वाचन करावे लागते, संदर्भ ग्रंथ चाळावे लागतात. या लेखनाच्या निमित्ताने माझा त्या विषयाचा पुन्हा अभ्यास होतो आणि मला त्यात खरोखरी आनंद मिळतोअसे ते आवर्जून सांगतात.
१९५८ साली एम्.डी.ची परीक्षा उत्तीर्ण होऊन ते एम्.आर.सी.पी.करण्यासाठी इंग्लंडला गेले. मेंदूचे विकार (न्युरॉलोजी) हा त्यांचा  अभ्यासाचा विषय असल्यामुळे त्यांना  एडिंबराला जावे लागले. या परीक्षेचा अभ्यासक्रम पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आले की त्यांचा हा विषय पूर्ण तयार आहे आणि या विषयातले सर्व मूलभूत तसेच प्रगत ज्ञान त्यांना  आहे. प्रत्येक बारीक सारीक तपशीलांवर, विस्तृत अभ्यास करून त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना व्याख्यानेदेखील दिली होती. त्यामुळे केवळ सहा आठवड्यातच या तयारीवर त्यांनी ही परीक्षा दिली आणि सहजरीत्या ते एम्.आर.सी.पी. उत्तीर्ण झाले.
'तारुण्याच्या उंबरठ्यावर' या 
माझ्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात     
एम्.आर.सी.पी.च्या परीक्षेमधील त्यांचा एक अनुभव विलक्षण आहे. एका रुग्णाचे, त्याच्याशी आजाराविषयी बोलून, माहिती विचारून, त्याच्या आजाराचे परीक्षण करून, परीक्षकांना ते सादर करायचे, आणि मग त्यावरील प्रश्नोत्तरांना सामोरे जायचे, अशी पद्धत वैद्यकीय परीक्षेत असते.त्यांना तपासण्यासाठी एक रुग्ण दिला गेला. त्यांनी त्या रुग्णाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे स्कॉटिश उच्चार यांना कळेनात आणि यांचे भारतीय पद्धतीचे इंग्रजी उच्चार त्याला समजेनात. त्यामुळे त्याच्या आजाराविषयी काहीच माहिती डॉ.सरदेसाईंना कळत नव्हती. शेवटी परीक्षक आले. त्यांना डॉक्टरांनी स्वच्छ सांगितले की, “मला रुग्णाच्या आजाराचा इतिहास समजत नाहीये”. त्यावर त्याने ती अडचण मान्य केली आणि त्या रुग्णाच्या हाताचा एक्सरे दाखवला. त्यावर डॉ.सरदेसाईंनी सांगितले, ”माझ्या देशात, जर भारतीय माणसाचा असा एक्सरे मी पाहिला असता, तर तो कुष्ठ रोगाचा आहे असे मी सांगितले असते; पण ब्रिटनमध्ये हा आजार अत्यंत दुर्मिळ आहे.”
त्या परीक्षकाने त्यांची पाठ थोपटली आणि अभिनंदन केले. त्यांची  अडचण समजून घेऊन त्यांच्या सर्वांगीण  ज्ञानावर त्यांने परीक्षा केली आणि त्यांना  उत्तीर्ण केले..“रॉयल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्ञानावर जगभर ओळखले जाते. एखादा विद्यार्थी परीक्षेत जरी अनुत्तीर्ण झाला, तरी इथे त्याने मिळवलेल्या त्याच्या ज्ञानावर तो पुढे निश्चितच यशस्वी होईल!” तिथल्या पदवीदान समारंभातसुद्धा सांगितलेले हे शब्द डॉ.सरदेसाईंना अजूनही आठवतात
इंग्लंडमधल्या वैद्यकीय शिक्षणाच्या पद्धतीतून धडे घेऊन आपल्याकडे सुधारणा व्हायला हवी असे डॉ..वि.सरदेसाईंना सतत वाटत आले आहे. १९७२-७३ साली ते पुणे विद्यापीठाच्या एम्.डी.परीक्षेसाठी परीक्षक म्हणून नियुक्त झाले. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना नेमके काय काय शिकवायचे असते? हा प्रश्न त्यांना पडला. याकरिता विद्यापीठाला पत्र पाठवून विचारणा केली, तर एक चार ओळींचे उत्तर आले. त्यात फक्त विद्यार्थ्यांची बारा व्याख्याने घ्यावीत, एवढाच उल्लेख होता. काही तरी वेगळे करावे, या उद्देशाने त्यांनी मग मुंबई, दिल्ली अशा जुन्या नामांकित बाहेरील विद्यापीठांशीदेखील पत्र-व्यवहार केला; परंतु त्या ठिकाणांहूनसुद्धा तशीच चार ओळीची उत्तरे आली. त्यांच्या लक्षात आले की ब्रिटिशांनी भारतात वैद्यकीय शिक्षण सुरू केले त्यानंतरच्या पन्नास वर्षात वैद्यकीय अभ्यासक्रम बदलावा, त्यात काही भारतीय रुग्णाच्या विचाराने बदल करावा असा विचारच आपल्या देशात झाला नव्हता. त्याउलट त्याच ब्रिटिशांनी त्यांच्या देशात मात्र दर दहा वर्षांनी तिथल्या अभ्यासक्रमात सतत नावीन्यपूर्ण सुधारणा केल्या आहेत.
वैद्यकीय शिक्षणाबाबत डॉ.सरदेसाई म्हणतात, “आपल्या भारतीय लोकांना कशा प्रकाराच्या वैद्यकीय सेवेची गरज आहे, कुठले वैद्यकीय ज्ञान असणे आवश्यक आहे, कसा डॉक्टर त्यांना हवा आहे याचे एक व्यापक सर्वेक्षण व्हायला हवे. त्याप्रमाणे आपला वैद्यकीय अभ्यासक्रम बदलायला हवा. आपले वैद्यकीय शिक्षण हे रुग्णाभिमुख असायला पाहिजे असा माझा ठाम विश्वास आहे. याकरता विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षात आयुर्वेद,योगासने,होमिओपाथी, लोकांशी सुसंवाद कसा साधावा याचे ज्ञान देणे आवश्यक आहे. कारण व्यवसाय करताना, जेंव्हा रुग्ण डॉक्टरांना विचारतो की, “पेरू थंड असतो की उष्ण?” आणि डॉक्टर काहीच उत्तर देऊ शकत नाही. किंवा काही रुग्ण म्हणतात, “ माझा वरचा श्वास वर राहतो आणि खालचा खाली.” अशावेळेस रुग्णाला नक्की काय म्हणायचेय? त्याला नक्की काय त्रास होतो आहे, हे डॉक्टरांना कळायला हवे. अजूनही आपली बहुसंख्य जनता अगदी उच्च शिक्षित लोकदेखील अशाप्रकारे विचार करतात आणि डॉक्टर नेहमीच त्यावर अडखळतात. त्यामुळे याप्रकारचे आयुर्वेदाचे प्राथमिक ज्ञान त्यांना असणे आवश्यक आहे आणि ते वैद्यकीय शिक्षणातच द्यायला हवे.
काही विशिष्ट आजारात होमिओपथीचा विलक्षण उपयोग होऊ शकतो हे मी स्वतः पाहिले आहे. त्यामुळे त्या शास्त्राचेसुद्धा ज्ञान विद्यार्थ्यांना हवे आहे. फक्त माझीच शाखा सर्वश्रेष्ठ आहे असा दुराभिमान बाळगून, डोळ्यांवर पट्टी बांधणे चुकीचे आहे, असे मला मनापासून वाटते. वैद्यकीय शिक्षणाच्या पुढच्या वर्षांमध्ये वेगवेगळ्या विषयांचे आवश्यक आणि व्यावहारिक ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावे. पदवी मिळाल्यानंतर त्याच्या आवडीच्या विषयात त्याला पदव्युत्तर आणि त्यापुढचे अतिप्रगत ज्ञान त्याला सहज घेता यायला हवे. असे घडल्यास आपल्या वैद्यकीय सेवेत निश्चितच सुधारणा होईल आणि रुग्णांना त्याचं लाभ होईल.” या अशा प्रकारच्या सूचना त्यांनी पुणे विद्यापीठाला लिहून पाठवल्या होत्या, पण त्याचा बहुधा विचार झाला नाही.
डॉ..वि.सरदेसाईंच्या पत्नी डॉ. सौ. कुंदा या पॅथॉलॉजिस्ट आहेत आणि सुरुवातीपासूनच, त्यांच्या  सर्व रुग्णांच्या आवश्यक त्या चाचण्या करून घेण्याची जबाबदारी घेऊन,त्यांच्या  वैद्यकीय सेवेत मदत करत आल्या आहेत. डॉ.सुहृद हा त्यांचा मुलगा इंग्लंडमध्ये ट्रुरो येथील इस्पितळात श्वसनसंस्थेच्या विकारांच्या विभागाचा प्रमुख म्हणून काम पाहतो. अत्यंत कमी वयात त्याला ही खूप महत्वाचे पद तिथे मिळाले. ‘पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा!’ ही त्यांची पिता म्हणून असलेली आकांक्षा त्याने पूर्ण केली याचा त्यांना  खूप आनंद वावतो.त्यांची  मुलगी सौ.अमला फाटक ही पुण्यातच असते.
आज वैद्यकीय सेवेबद्दल आणि त्यातल्या नितीमत्तेच्या ऱ्हासाबद्दल नेहेमी बोलले जाते. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामधील नाते नष्ट होत चालले आहे अशी ओरड सतत सर्वत्र होत असते. अशा जमान्यात डॉ.सरदेसाईंसारखा आदर्श धन्वंतरी सर्व डॉक्टरांना वादळी प्रवासात दिशा दाखवणारा अढळ ध्रुवताऱ्याप्रमाणे मार्गदर्शक ठरावा.

Saturday, March 14, 2020

Appeal for Misleading Social media Posts #COVID-19


Indian Medical Association, Maharashtra state appeals all the Citizens of India that,

If you come across any doubtful or misleading post in any social media, regarding COVID-19 treatment or effects, instead of forwarding it to other groups, please forward it to the following IMA WhatsApp number -

9823087561

We, at IMA will analyze it scientifically and reply back to you immediately.

If any post is found offensive, misleading or antisocial, IMA will file a complaint of Cybercrime against the Original Creator of that Post.



Dr. Avinash Bhondwe

President,

IMA Maharashtra State

Thursday, July 11, 2019

माझे पेशंट्स माझे गुरु




      १३ डिसेंबर १९८३ रोजी मला एम.बी.बी.एस.चे रजिस्ट्रेशन मिळाले आणि केवळ तीन आठवड्यातच म्हणजे ५ जानेवारी १९८५ ला मी माझ्या दवाखान्याचे उद्घाटन केले. मला मेरीटने मिळालेली पदव्युत्तर शिक्षणाची जागा मी घेतली नाही. आपण फॅमिली डॉक्टर म्हणूनच व्यवसाय करायचा हे मी पक्के ठरवले होते.
      डॉक्टरांना आपली जाहिरात करता येत नाही. जनसंपर्क आणि रुग्णांवर इलाज करताना आलेले यश यावरच त्याची प्रसिद्धी आपोआपच होत असते, हे मला पक्के माहिती होते. यालाच त्याकाळी 'या डॉक्टरांचा लगेच गुण येतो' असे म्हणण्याची पद्धत आहे. त्यामुळे   उद्घाटनाच्याच्या आधी आठवडाभर मी आजूबाजूच्या सुमारे शंभर घरांमध्ये उद्घाटनानिमित्त ठेवलेल्या सत्यनारायण पूजेच्या तीर्थप्रसादाच्या निमंत्रण पत्रिका वाटल्या. 'निमंत्रण दिले की जायचेच' ही भावना त्याकाळी ठाम रुजलेली होती. साहजिकच हे सर्व लोक आठवणीने माझ्या उद्घाटनाला हजर होते. एवढे लोक येतील अशी माझ्या आई-वडिलांना कल्पना नव्हती. फारतर मित्र आणि नातेवाईक मिळून ५०-६० लोक येतील असे त्यांना वाटले होते. पण सुमारे ४००-४५० पाहुणे आल्याने तीर्थ आणि प्रसाद परत बनवावा लागला.
      या आलेल्या कुटुंबांपैकी जवळजवळ सर्व जण आजही संपर्कात आहेत. अधूनमधून का होईना ते माझ्याकडे सल्ला घ्यायला येतात. आजही दवाखान्यात नंबर लावून बसताना, "आम्ही डॉक्टरांचे पहिल्या दिवशीपासूनचे पेशंट्स" असे रिसेप्शनिस्टला आणि आजूबाजूला थांबलेल्या लोकांना अभिमानाने सांगतात. या साऱ्यांच्या प्रेमाने माझी प्रॅक्टिस पहिल्या सहा महिन्यातच खूप वाढली. आणि अनपेक्षितपणे मी शिवाजीनगर भागातील एक 'चांगला हातगुण असलेला डॉक्टर म्हणून अल्पावधीतच ओळखला जाऊ लागलो. 
      त्या ५ जानेवारीला तीर्थप्रसादाला आलेल्यांपैकी प्रत्येकाने माझी भेट घेऊन काही सूचना केल्या. काहींनी पुष्पगुच्छ दिले, काही जणांनी आहेरासारखी पाकिटे देऊ केली. (अर्थातच मी ती स्वीकारली नाहीत.) यामध्ये काही वडिलधाऱ्या व्यक्तींनी मनापासून केलेल्या सूचना अतिशय उपयुक्त ठरल्या. उदाहरणार्थ-
·         दवाखाना नऊला म्हणजे नऊलाच उघडला पाहिजे.
·         सुरुवातीला पेशंट्स नसले तरी पूर्णवेळ थांब. लोक जाता येता बघत असतात. दुपारी २ पर्यंत डॉक्टर असतो. मग वेळ आली की बरोबर आठवणीने येतात.
·         या भागातले दवाखाने रात्री नऊला बंद होतात, तुम्ही दहा पर्यंत थांबा
·         एखादी गरीब भिकारीण आली तरी तिला राणी असल्यासारखी वागवा. हे गरीबच आपले पेशंट्स असतात.
·         पैसे नसले तर औषध देऊ नका. त्या अमुक तमुक डॉक्टरकडे उधारी केलेल्या पाचशे जणांची यादी आहे. लोक उधारी ठेवतात आणि मग ती चुकवावी लागेल म्हणून डॉक्टर बदलतात.
·         कामाला माणसे जवळ राहणारी ठेवा. तुम्हाला उशीरा किंवा रात्री अपरात्रीपर्यंत दवाखाना चालू ठेवता येईल.
·         या भागात काही लोकांचे वर्चस्व आहे. त्यांचे खूप नातेवाईक आहेत. त्यांच्याशी संबंध चांगले ठेवा.
·         औषधांचे हिशेब व्यवस्थित ठेवा. कुणा औषधवाल्यांकडे तुमची काही उधारी ठेवू नका.
·         डॉक्टरला फोन पाहिजे. माझ्या ओळखीचे एकजण आहेत, तुम्हाला लगेच फोन मिळेल.
·         डॉक्टरला गाडी वापरली पाहिजे. सेकंडहॅण्ड का होईना एक कार घेऊन टाका. डॉक्टरच्या दवाखान्याबाहेत त्याची कार असली की डॉक्टर चांगला असे लोकांना वाटते.  
      यापैकी जवळजवळ सर्व सूचना मी पाळल्या. त्याचा मला व्यवसायात खरंच उपयोग झाला. मेडिकल कॉलेजमध्ये वर्गात सर्व पुस्तकातल्या आजारांचा परिचय होतो. त्यांचे उपचार समजतात. कॉलेजच्या क्लिनिकल टर्म्समध्ये प्रत्यक्ष रुग्णाशी बोलणे आणि तपासणे होते. पण व्यवसाय कसा करावा? रुग्णांच्या डॉक्टरांकडून काय अपेक्षा असतात, हे मला या 'गुरूंकडूनच' शिकायला मिळाले.
      रुग्ण तपासताना त्याचे म्हणणे नीट समजून घ्यावे लागते. आपल्या मनाने आधीच त्याचे निदान पक्के करायचे नसते. नाहीतर गोंधळ झालाच म्हणून समजा. व्यवसायाच्या सुरुवातीला घडलेला एक प्रसंग माझ्या मनावर याचे पक्के संस्कार करून गेला.
      मी दवाखाना सुरु केला त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता माझ्या घराची बेल वाजली. मी दार उघडले तर आमच्याच सोसायटीत राहणाऱ्या एक गुजराथी महिला उभी होती. त्यांचे नवीनच लग्न झाले होते आणि त्या गुजराथी मिश्रित मराठी बोलायच्या.
मी त्यांना आत बोलावले. " काय विशेष एवढ्या सकाळ सकाळी?"
"हो ना. माझ्या मिस्टरना बरे नाही"
"हो? काय होतेय त्यांना?" मी गडबडून विचारले.
"अरे, काल रात्रभर त्याला तरास होतोय"
"कसला त्रास?"
"अरे, रातभर सारखा संडासला जातेय तो?"
"अरे बापरे, किती वेळा गेला?"
"पन्नास-साठ वेळा तरी गेला असेल?" बाईंचा स्वर खूप घाबरलेला वाटला.
"मग अॅडमिट करायचे का त्यांना?" एवढे ५० जुलाब म्हणजे मला त्याचे डीहायड्रेशन दिसू लागले. यावर आपण काय करणार? असा विचारही मनात डोकावून गेला.
" नको. तुम्हीच काही तरी द्या."
"त्यांना एक तर इथे घेऊन या नाही तर मला घरी येऊन पाहावे लागेल त्यांना. त्यांना तपासावे लागेल, त्यांचे बीपी वगैरे पहावे लागेल." माझ्यातला फिजिशियन बोलू लागला.
" खूप थकून गेलाय तो. तुम्ही औषध द्या... नंतर जमलं तर आणते."
मी "ठीक आहे" म्हणालो आणि विचार करू लगलो. त्याकाळी असे खूप जुलाब झाले की लोमोटील नावाच्या गोळ्या द्यायचे. असे खूप जुलाब झाले की एका वेळेस २ गोळ्या आणि नंतर प्रत्येक जुलाबानंतर एक-एक अशा जुलाब थांबेपर्यंत द्याव्या, असा संकेत होता. पण ५०-६० वेळा माणूस संडासला गेलाय...म्हणून मी गोळ्या लिहून दिल्या आणि सांगितले,
"आत्ता २ गोळ्या आणि नंतर प्रत्येकवेळा संडासला जाऊन आल्यावर एकेक.. असं बरं वाटेपर्यंत... पण तरी काही त्रास जास्त झाला तर मला बोलवा नाहीतर उद्या घेऊन या"
बाईंनी प्रिस्क्रिप्शन घेतले आणि गेल्या.
साधारणतः तासाभराने त्यांच्या 'मिस्टर'ला घेऊन त्या पुन्हा आल्या... त्या गृहस्थांना मराठी उत्तम येत होते. त्यांच्या सौप्रमाणे गुजराथीमिश्रित नव्हते. त्यांना घरातल्या सोफ्यावर झोपवून तपासताना मी विचारले, "फारच गळून गेलेले दिसताय. आता गेल्या तासाभरात किती जुलाब झाले?"
हाताला बीपीचा पट्टा बांधलेल्या अवस्थेत रुग्ण महाशय ताडकन उठून बसले. म्हणाले,
"जुलाब? अरे मला जुलाब नाही होत."
"मग? मला तर सांगितले की तुम्ही रात्रभरात पन्नास-साठवेळा संडासला गेलात."
" अरे अविनाशभाई, मला कालपासून शौचाला होत नव्हती. सारखं वाटायचं आली... म्हणून मी जात होतो. पण होत नव्हती. मला कॉन्सटिपेशनचा त्रास आहे. दोन दिवस गावाला जाऊन आलो. उन्हात फिरलो. पाणी मिळाले नाही. म्हणून संडासला त्रास होतोय."
हे ऐकल्यावर माझ्याच पोटात गोळा आला.... कारण बाईने सांगितल्याप्रमाणे मी त्याला खूप जुलाब होतायत म्हणून औषध दिले होते. तरी मी चेहऱ्यावर काही न दाखवता त्यांना परत झोपवले. त्यांचे बीपी बघितले. आणि बाईना विचारले,
"मघाशी दिलेली औषधे घेतली का?"
नकारात्मक मान हलवत त्या म्हणाल्या, "दुकाने बंद होती. आता साडेनऊला उघडतील."
मी उसने अवसान आणत म्हणालो, "आता तपासल्यावर माझ्या लक्षात आले की औषधे बदलावी लागतील."
मी आधीची चिट्ठी ताब्यात घेतली आणि नव्याने "पोट साफ होण्याची औषधे लिहून दिली."
जाताना त्यांनी देऊ केलेली फी मी नाकारली. म्हणालो, "अहो शेजारधर्म आहे हा. तुम्ही मला लहानपणापासून पाहताय. तुमच्याकडून कशी फी घ्यायची?" मात्र मनात स्वतःशीच म्हणालो, "पेशंट तपासताना त्याच्या तक्रारी नीट समजून घ्याव्यात. भाषेतला, भावनेतला गोंधळ करू नये. हा धडा तुम्ही मला शिकवलात. त्याची गुरुदक्षिणा म्हणून मीच खरी तुम्हाला फी द्यायला पाहिजे"
गेल्या पस्तीस वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये माझ्या पेशंट्सने दिलेल्या अशा अनेक शिकवण्या आचरणात आणत माझी जडणघडण होत गेली हे मी अनेकदा मान्य करतो.   

-डॉ.अविनाश भोंडवे

(फॅमिली डॉक्टर)


  

Tuesday, June 4, 2019

रे फुला




नदी किनारी फिरत होतो...प्रवाह संथपणे वाहत होता..

कागद काटक्या पाने 

प्रवाहाबरोबर तितक्याच संथपणे पुढे पुढे चालली होती...
एक फूल मला दिसले, सुकुमार, मोहक आणि नाजूक

तेही पाण्यावर तरंगत, डुलत झुलत पुढे जात होते..

किनाऱ्यावरून मी त्या फुलाला निरखत होतो...

अचानक पुढे एक भोवरा दिसला..

वेगवान

गर्रारा फिरणारा...

फूल त्या दिशेनेच सरकत होते..

काळजात चर्र झाले...

काय होणार त्या फुलाचे..
.
पुढे जाणार की त्या गर्तेत फिरत बुडून जाणार?

Monday, April 1, 2019

तुझी माझी रिलेशनशिप

प्रिय,
      तुझी माझी रिलेशनशिप जन्मजन्मांतरीची आहे. युगानुयुगे मी तुझ्या प्रेमपाशात शपथबद्ध आहे. एकापरीने आजकालची मुलेमुली म्हणतात, तसे आपले नाते म्हणजे एक 'लिव्ह-इन रिलेशनशिप'च म्हणायला हवी. तुझ्या माझ्या या नात्यासाठी मी माझ्या लग्नाच्या बायकोची आणि मुलांची नेहमीच परवड केली. आपल्या नातेसंबंधात मी एवढा बुडून गेलो होतो की त्यांच्याकडे लक्ष द्यायला कधी वेळ काढलाच नाही.
       मला आठवतात अजूनही आपल्या नात्यातले ते सुरुवातीचे दिवस. मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार होतो. तुझ्याकडून होणाऱ्या माझ्या प्रशंसेने आसमंत व्यापून जायचा. तुझ्याद्वारे क्षणोक्षणी होणारी माझी तारीफ, तुझ्या आयुष्यातले माझे मानाचे उच्चस्थान, तुझ्याकडून मला हरघडी मिळणारा आदर, माझे मन तृप्त करायचा. मी होतो प्राणरक्षक, मी होतो पुनर्जीवन दाता आणि हो 'देव'सुद्धा!!
      आपले भारतीय म्हणजे कमालीचे सिनेमावेडे. चित्रपटातील कुठल्याही प्रेमकथेत व्हिलन आल्याशिवाय त्यांना मजा येत नाही. अनेक युगाब्द सुरळीतपणे चाललेल्या आपल्या प्रेमसंबंधातदेखील खलनायकांचा रीतसर प्रवेश झाला. एक आला, दोन आले, एका पाठोपाठ किती आले, तुला आणि मला पत्ताच लागला नाही. पाहता पाहता त्या खलनायकांच्या विषारी पाशात आपल्या रिलेशनशिपला ओहोटी लागली. यातले काही खलनायक माझेच बांधव होते, काही माझे हितशत्रू होते आणि बाकीचे कायद्याचे रक्षक होते.
      माझ्याबाजूने मी अजूनही आपल्या नात्याबाबत ठाम आहे, पण तुझ्या मनावर त्यांच्या खलवृत्तीचा पूर्ण प्रभाव पडल्याचे मला पदोपदी जाणवत आहे. आजही मी वेड्यासारखा तुझ्यासाठी धावत आहे, पण तुला त्याचे काहीदेखील सोयरसुतक नाही.
     
आपल्या संबंधांवर पहिला हल्ला झाला, त्यात मी तुझ्या तब्येतीची बिलकुल पर्वा करत नाही, असे या रक्षकांनी ठरवले. आपल्या नातेसंबंधांना पूर्ण कात्री लावून, तू माझे गिऱ्हाईक आहेस आणि मी दुकानदार असे जाहीर केले. आपले नाते 'कन्झ्युमर प्रोटेक्शन अॅक्ट'च्या कक्षेने काबीज केले.
      मी करत असलेल्या तुझ्या सेवेसाठी त्यांनी त्यांचे मापदंड लावायला सुरुवात केली. 'क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अॅक्ट'चा घाट घातला. देशातल्या अनेक राज्यात तो तुला आणि मला न विचारता लागू करण्याचा प्रयत्न केला आणि अजूनही तो निकराने चालूच आहे.
      आपल्या नात्याला तोडू इच्छिणाऱ्या काही कुऱ्हाडीच्या दांड्यांनी आपले संबंध केवळ आर्थिक आहेत असा शोध लावला. आपल्या नात्यात कुठलीही सचोटी, प्रेम नाही असे ते सांगू लागले. तहानभूक विसरून, कडक थंडी असो, मुसळधार पाऊस असो, रणरणते उन असो; तुझ्या हाकेला दिवसरात्रीची पर्वा न करता, मी जी 'ओ' देत होतो, ती केवळ मूठभर पैशासाठीच असे ते घडोघडी जाहीर करू लागले. तुझी मी करत असलेली निरलस सेवा ही मायेपोटी नसून 'माया' गोळा करण्यासाठी आहे, असा यांचा दावा. मी तुझ्याकडे केवळ तुझ्या पैशांसाठीच येतो. तुला लुटतो आणि माझे उखळ पांढरे करतो असे ते पुरावे गोळा करून सांगू लागले. मायबाप सरकारदेखील त्यांच्या बोळ्यानेच दूध पिऊ लागले.
      तुझी सेवा जास्त चांगली घडावी, तुझ्या आयुष्यातली काळरात्र सरावी, आनंदाचा आरोग्याचा उदय व्हावा, म्हणून उत्तम आणि ज्ञानीजनांच्या सेवामंदिरांचा मार्ग मी तुला दाखवतो, तो प्रत्येक वेळेस फक्त काही 'चवली-पावली' मिळावी म्हणूनच, असा जावईशोध आमच्याच वंशाच्या काही सज्जनांनी लावला. आपल्या संबंधांवर हा कदाचित वर्मी बसणारा घाव असेल. अखेरचा नक्कीच नसेल, कारण असे घाव दरदिवशी माझ्यावर पडतच आहेत. पण हा घाव म्हणजे आपले संबंध पूर्णपणे 'पैशाधिष्ठित' आहेत, असे कायदेशीरपणे बेमालूम सिद्ध करण्याचा आहे. हा वार माझ्यावर केल्याने आपल्या संबंधांना कायमचे संपवल्याचा आसुरी आनंद या 'कर्मवीरांना' मायबाप सरकारच्या आश्रयाखाली मिळणार आहे. 'कट प्रॅक्टिसविरोधी कायदा' असे गोंडस नाव देऊन मला भयभीत करून आपल्या 'रिलेशनशिप'ला कायमचा 'ब्रेक' देण्याची ही आपल्या मित्रांचीच खेळी आहे.
      सध्या माझी मनःस्थिती फारच गंभीर आहे. "राजा जागा रहा. रात्र वैऱ्याची आहे." हा संवाद आठवून माझी रोजची झोपच उडाली आहे. तुझ्या सेवेचे उत्तुंग ध्येय ठेवून या पेशात आलो, रात्रंदिन मरणांसोबतच्या युद्धाचे प्रसंग रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत तुझ्याकरिता लढलो; पण आता वाटते बस्स!! कायमचे तोडून टाकावेत तुझे माझे संबंध आणि स्वस्थ घरी बसावे हरी हरी म्हणत. गोळा करावे माझ्यासारखे दु:खी कष्टी आणि आम्हाला आदर्श मानून या रिलेशनशिपमध्ये नव्याने अडकू इच्छिणारे. आयुष्याच्या करुण गर्तेत वेगाने फिरताना एका गाण्याचे शब्द सतत आठवतात, 'अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी, लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती.'  

      शेवटी वाटते, जाऊ दे. भोळे सांब आहोत आपण. आपली रिलेशनशिपची वाटच चुकली. डॉक्टर-पेशंट नात्याची ही या जगातली आणि या युगातली 'लिव्ह-इन रिलेशनशिप' आपल्याला कळलीच नाही.    

Wednesday, March 27, 2019

वाचवा उद्याची पिढी जंक फूडपासून



मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व शाळांच्या परिसरात, शाळांच्या उपहारगृहात 'जंक फूड' दिले जाऊ नये असे फर्मान काढले. दिल्ली उच्च न्यायालयाने यासंदर्भात मार्च २०१५ मध्ये तसे स्पष्टपणे केंद्र सरकारला सुनावले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल म्हणून दोन वर्षापूर्वी केंद्र सरकारने त्याप्रमाणे एक आदेशही सर्व राज्य सरकारांना काढला होता. या आदेशांनुसार उशीरा का होईना, पण ही पावले उचलली गेली.

महाराष्ट्र सरकारनंतर नागालँड सरकारनेदेखील याचप्रमाणे शाळेच्या परिसरात या जंक फूडला बंदी घातली आणि इतर सरकारेही या पद्धतीचा निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे.

जंक फूड म्हणजे काय?

प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, ज्यांच्यात साखर, मीठ आणि स्निग्ध पदार्थ म्हणजेच तेल, तूप, चरबी यांचे प्रमाण जास्त असते. या पदार्थांमध्ये भरपूर उष्मांक असतात, पण पौष्टिकपणाबाबत पूर्ण ठणठणाट असतो.

जंक फूडची यादी तशी फार मोठी होईल, पण यात- 

·         स्टॉल किंवा हातगाडीवर सहज मिळणारे पदार्थ- वेफर्स, पापडी, चिप्स, मसाला चिप्स

·         भारतीय पदार्थ- वडे, सामोसे, भजी, शेव, भेळ

·         आंतरराष्ट्रीय पदार्थ- पिझ्झा, बर्गर, डोनट

·         बेकरी प्रॉडक्ट्स- खारी, बिस्किट्स, बटर, टोस्ट्स, बनपाव

·         इतर- चॉकोलेट, केक्स, पेस्ट्री, लॉलीपॉप

या नियमामुळे तयार सरबते, बर्फाचे गोळे, कार्बोनेटेड तसेच नॉन-कार्बोनेटेड शीतपेये, रसगुल्ला, गुलाबजाम, पेढे, कलाकंद, नूडल्स, पिझ्झा, बर्गर, टिक्का, पाणीपुरी, गोळ्या आणि कँडी, जिलेबी, बुंदी,  इमरती, चॉकलेट्स, मिठाया, केक आणि बिस्किटे, बन्स, पेस्ट्री, जाम आणि जेली या गोष्टी शाळांच्या उपहारगृहातून हद्दपार होतील.

आजच्या गतिमान जीवनात प्रत्येकाला दैनंदिन कामात कमालीची धावपळ करावी लागते. त्यात अनेक कुटुंबांमध्ये नवराबायको दोघेही नोकरीला असतात आणि त्यामुळे घरच्याघरी रोजच न्याहारी बनवण्याऐवजी काही तरी रेडीमेड गोष्ट खाण्यासाठी वापरण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे मुलांना डब्यात भाजीपोळी देण्याऐवजी पॅटिस, पावभाजी किंवा वडापाव दिला जातो. ही वस्तुस्थिती आहे. कित्येकदा आईवडील मुलांना डबा देण्याऐवजी, मधल्या सुटीत असे जंक फूड खायला वरखर्च म्हणून पैसे देतात.

   त्यात पुन्हा टेलिव्हिजनवरील आकर्षक आणि फसव्या जाहिरातीमुळे पिझा, बर्गरसारखे आंतरराष्ट्रीय पदार्थ खायला मुलेच नव्हे तर सारेच आबालवृद्ध प्रवृत्त होतात. या साऱ्याचा परिपाक म्हणून, विशेषत: शहरी व निमशहरी भागांतील बहुसंख्य लोक बरेच वेळा प्रक्रियाकृत, पॅकबंद व ब्रँडेड अन्नपदार्थ (प्रोसेस्ड फूड) विकत घेऊ लागले आहेत.

प्रोसेस्ड फूड्स

प्रोसेस्ड फूड किंवा प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ म्हणजे, अन्नपदार्थांवर खाद्यविषयक तंत्रज्ञानाचा वापर करून, ते जास्त टिकण्याच्या आणि झटपट खाण्याच्या दृष्टीने बनवले जातात. उदाहरणार्थ रेडीमिक्स सूप, मॅगी, चिकन-मटणाचे पदार्थ इ. त्याचप्रमाणे पास्ता, मिठाया, दुग्धजन्य पदार्थ (उदा. तयार मसाला दूध, दही, लस्सी, पनीर ), बेकरीतले पदार्थ, कॉर्नफ्लेक्ससारखे न्याहारीचे पदार्थ, डबाबंद अन्न पदार्थ (उदा. गुलाबजाम, रसगुल्ले, वाटाणा, फळे, फळांचे काप, फळांचे गर इ.). मूळच्या अन्नपदार्थांवर यांत्रिकी आणि रासायनिक प्रक्रिया करून हे झटपट पदार्थ बनत असल्याने ते नक्की महाग असतात.

अन्नावर प्रक्रिया करण्याची प्रमुख कारणे म्हणजे ते टिकवणे, अतिरिक्त उत्पादन वाया जाऊ न देणे, हंगाम गेल्यावरही ती फळे अगर भाज्या उपलब्ध होणे अशी असतात. पापड, सांडगे, लोणची, मुरांबे यांना याप्रकारची घरगुती प्रक्रिया केली जाणारी पारंपरिक उदाहरणे म्हणता येतील.

पण दूध, दही, फळे, भाजीपाला, मासे, चिकन-मटण, अनेक कडधान्ये आणि शेंगभाज्या यांच्यावर प्रक्रिया करून विविध तयार डबाबंद अन्नपदार्थ आता बनवले जातात. त्यांचा व्यापार हा आता हा अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांचा मोठाच उद्योग झाला आहे.

कित्येक लोक एकावेळच्या किंवा दोन्ही वेळेच्या जेवणाऐवजी प्रोसेस्ड अन्नपदार्थ खातात, तर काही सकाळच्या न्याहारीला किंवा इतर वेळेस स्नॅक्स म्हणून खातात. या पदार्थामधून शरीराला मिळणारी पोषणमूल्ये अनेक गोष्टींवर अवलंबून असतात. म्हणजे  तो पदार्थ बनवताना तो भाजून, आंबवून, अतिशीत करून, वाळवून अशाप्रकारच्या कुठल्या पद्धतीने बनवला आहे? किंवा तो बनवताना त्यामध्ये मुळात नसलेल्या काही इतर अनैसर्गिक अन्नघटकांची भर टाकली आहे का? हे घटक शरीराला किती फायदेशीर आहेत? तसंच ते खाणाऱ्याने किती वेळा आणि किती प्रमाणात खाल्ले? पोषणमूल्यांसाठी या साऱ्या गोष्टींचा विचार करावा लागतो.

जंक फूड्सचे तोटे

·         नाश्त्याचे पदार्थ- शहरी भागात पाव, बिस्किटे, खारी, टोस्ट, बटर, केक्स, नानकटाई, कुकीज असे बेकरीतले पदार्थ आणि चिप्स, कँडीज,चॉकलेट, पेपरमिंट असे निरर्थक पदार्थ खाल्ले जातात. यातून शरीराला फक्त कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि साखर मिळते, परंतु त्यात असलेले रंग आणि इतर रसायने शरीराला अपायकारक असतात.

·         इंस्टंट फूड- कॉर्नफ्लेक्स, झटपट सूप, मॅगी, नूडल्स यात मोनोसोडियम ग्लुटामेट नावाचा शरीराला हानिकारक क्षार असतो.यामुळे रक्तातील क्षारांचे प्रमाण वाढून उच्चरक्तदाब, मूत्रपिंडांचे विकार होऊ शकतात.

·         फास्ट फूड- पिझा, बर्गर, फ्राईड फिश, अशा पदार्थात अन्वश्यक चरबीयुक्त पदार्थ, क्षार असतात. त्यामुळे उष्मांक वाढतात.

·         मिल्कशेक्स, सँडविच अशा पदार्थात जंतूसंसर्ग होऊ शकतो.

·         डोसा, पावभाजी, पाणीपुरी, भेळ, वडापाव, भजी अशा हातगाडीवर मिळणाऱ्या पदार्थात वापरले जाणारे पदार्थ म्हणजे, तेल, पीठ, मसाला फारशा चांगल्या प्रतीचे नसतात. त्यामुळे उलट्या, जुलाब, अमांश, कावीळ, टायफॉइड असे आजार सहजी होऊ शकतात.

·         वडे, भजी यासाठी वापरले जाणारे तेल दिवसभर सतत उकळत असते, त्यामुळे रक्तदाब वाढणे, कोलेस्टेरॉल वाढणे असे त्रास होतात.

·         ज्यूस. बर्फाचे गोळे, सरबते, आईस्क्रीम्स, कुल्फी अशा गोष्टींसाठी वापरला जाणारा बर्फ प्रमाणित नसतो आणि पाणी  दूषित असा असते. त्यामुळे उलट्या-जुलाब, कावीळ, विषमज्वर असे साथीचे आजार पसरतात.

·         रस्त्यावर मिळणाऱ्या आणि उघड्यावर असलेल्या खाद्यपदार्थावर रस्त्यावरची धूळ बसते. माशा बसत असतात, शिवाय ते पदार्थ बनविणाऱ्या व्यक्तीचे आरोग्य शंकास्पद असते. साहजिकच रोगराईला ते आमंत्रण ठरते.    

जीवनशैलीचे आजार

शाळेतील मुलांच्या आहारात अशी नि:सत्व आणि अपायकारक खाद्ये आल्यावर त्यांचे आरोग्य बिघडतेच, पण या पदार्थात बहुतांशी स्निग्ध पदार्थ, मीठ, इतर क्षार आणि कृत्रिम साखर यांची रेलचेल असते. त्यामुळे त्यांच्यात भरपूर उष्मांक असतात. मात्र त्यात चोथायुक्त पदार्थ (फायबर), जीवनसत्वे आणि खनिजांचा पूर्ण अभाव असतो.

यामुळे शालेय वयातच बेसुमार वजनवाढ होण्याची शक्यता असते. या स्थूलपणामुळे या मुलांना त्यांच्या तारुण्यातच मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, मूत्रपिंडाचे विकार असे जीवनशैलीशी निगडित दुर्धर आजार होतात, हे संशोधकांनी दाखवून दिले आहे.

·         या पदार्थात 'फ्रुक्टोज' प्रकारची साखर असल्याने हे पदार्थ खाल्ल्यावर आपले पोट भरले आहे आणि आपली भूक भागली आहे अशी नैसर्गिक जाणीव होत नाही. साहजिकच हे पदार्थ वारेमाप प्रमाणात खाल्ले जातात आणि वजनवाढ व इतर दोष निर्माण होतात.

·         या पदार्थात प्रिझर्व्हेटिव्हज म्हणून तसेच रंग-वास-चव येण्यासाठी अनेक घातक कृत्रिम रसायने वापरली जातात. या रसायनांमुळे या अन्नपदार्थांचे व्यसन लागते आणि मग भूक नसताना आणि शरीराला गरज नसताना ते खाल्ले जातात. रोजच्या आवश्यक भाजी-पोळी ऐवजी या चटकदार पदार्थांवर ताव मारला जातो आणि आरोग्य ढासळते.

पोष्टिक पर्याय

राज्य शासनाने शाळांच्या कॅन्टीनमध्ये जंक फूडऐवजी काय पदार्थ ठेवावेत, यासाठी
हैदराबादेच्या 'राष्ट्रीय आहार संस्थेची' मदत घेऊन मुलांसाठी खास पौष्टिक मेनू ठेवावा आसे सुचवले आहे.

त्यामुळे आता शाळांच्या उपाहारगृहात, गव्हाची रोटी-पराठा, पालेभाज्यानी बनलेले पदार्थ, भात-भाजी, पुलाव, डाळ, काळा चणा, गव्हाचा हलवा, गोड दलिया, नमकीन दलिया, राजमा, कढी, उपमा, खिचडी,  टोमॅटो, अंडी, इडली-वडा सांबार, खीर-फिरनी, दूध आणि दुग्धजन्य दही-ताक, लस्सी, भाज्यांचा उपमा, भाज्यांचे सँडविच, भाज्यांची खिचडी, नारळाचे पाणी, शिकंजी, जलजिरा इत्यादी पदार्थ विक्रीसाठी ठेवावेत असा अध्यादेश शासनाने जारी केला आहे.

पर्यायी घरगुती पदार्थ

जंक फूड आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक अनर्थापासून उद्याच्या पिढीला वाचवण्यासाठी केवळ शाळेत अशा पदार्थांवर बंदी येऊन भागणार नाही. त्याकरिता दैनंदिन जीवनात मुलांना पर्यायी, आरोग्यवर्धक आणि खावासा वाटणारा कुठला खाऊ द्यायचा हा प्रश्न निर्माण होणार आहे.

याचे उत्तर आपल्या पारंपारिक न्याहारीच्या पदार्थात तर आहेच, पण कित्येक आहार तज्ञांनी बनवलेल्या उत्तम पाककृतीतसुद्धा मिळू शकेल. वानगी दाखल काही पदार्थ. 

  • परंपरागत खाद्य-  पोहे, उपमा, शिरा, लापशी, खीर, शेवया, चिक्की, राजगिऱ्याचा लाडू, रेवडी, गोडी/गाठी शेव, इडली.
  • वेगवेगळे लाडू- उदा. रव्याचा लाडू, बुंदीचा लाडू, बेसन लाडू, काजू-बदाम-खारीक-खोबरे यांचा लाडू, शेंगदाण्याचा लाडू, चपाती-गूळ-तूप यापासून बनवलेला लाडू.
  • सलाड्स- मोड आलेल्या धान्यांची भेळ, फळांचे काप, काकड्या इ.
  • तांदळाचे पदार्थ- पुदिना राईस, सोया फ्राईड राईस, अपल फ्राईड राईस, पनीर पुलाव, मेथी-पिज पुलाव, छोले बिर्याणी चना बिर्याणी इ.
  • घरगुती चमचमीत/तळीव पदार्थ- भजी, वडे, शेव, पापड्या, कुरडया, पापड, करंज्या, पुऱ्या, शंकरपाळी, चकली, कडबोळी इ.
  • घरगुती मिनी मील्स- अनेक प्रकारची व्हेज-नॉनव्हेज, सॅण्डविचेस, पोळीचे रोल, घावन, थालीपीठ, धिरडे, आंबोळ्या, अप्पम इ.

पालकांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, की तुमच्या हाताने बनलेले, घरातले स्वच्छ पदार्थ वापरलेले पदार्थ तुमच्या कुटुंबाला जास्त निरामय ठेवतील.

एकविसाव्या शतकात यापुढे बहुसंख्य लोकांना घराबाहेर जास्त वेळ राहावं लागणार आहे. त्यामुळे प्रक्रिया केलेले अन्न दिवसातून एकदा तरी खाण्याची वेळ कदाचित प्रत्येकावर येईल. साहजिकच या अन्नाला पर्याय राहणार नाही. परंतु तरीसुद्धा जर आरोग्याची डोळस जाणीव ठेवून या अन्नपदार्थांचे आवश्यक तेवढेच आणि मर्यादित सेवन केले, आणि इतर वेळेस आरोग्याचे पालन करणारा चौरस आहार घेतला,तर कदाचित पुढील पिढीवर होणाऱ्या दुष्परिणामांची तीव्रता कमी राहील